‘अभंग रिपोस्ट’ने घडविली पंढरीची वारी; संगमनेर मर्चन्ट्सच्या ‘प्रेरणा दिना’चा शुभारंभ

 सहकाराची ताकद विश्वासामध्ये - राजेश मालपाणी ;



संगमनेर, प्रति; सहकाराची खरी ताकद विश्वासामध्ये आहे. या अद्भुत शक्तीच्या बळावरच संगमनेर मर्चंट बँकेने सातत्यपूर्ण प्रगतीची दिमाखदार साठवर्ष पूर्ण केली आहेत, असा विश्वास संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला. मर्चन्ट्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष व संगमनेरचे भूषण उद्योगपती स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘प्रेरणा दिन’ उपक्रमाच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ललितादेवी मालपाणी, व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर, प्रकल्प समितीचे अध्यक्ष प्रकाश कलंत्री, तज्ञ संचालक सीए.संजय राठी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई आदी उपस्थित होते,यावेळी पुढे बोलताना मालपाणी म्हणाले की, साठ वर्षांपूर्वी बँकेच्या स्थापनेच्या वेळचे चित्र वेगळे होते. मात्र काळ कितीही बदलला तरीही सचोटी, पारदर्शकता, काटकसर, ग्राहकाभिमुखता ही तत्वे बदलत नाहीत. त्यांचे महत्त्व कायम आहे. संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी या तत्त्वांच्या आधारावर निर्माण केलेल्या वाटेचा आज महामार्ग झाला. इतकी किमया त्या मूलभूत तत्त्वांच्या अंगी आहे. सहकारी बँकांसमोर सातत्याने वाढणारी आव्हाने कितीही मोठी असली तरी संस्थेला प्राणप्रणाने जपणारे संचालक मंडळ जेथे असते, तेथे चिंता करण्याचे कारण नसते अशी आश्‍वासक पृष्टीही त्यांनी जोडली. नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांनी संस्थेच्या गौरवशाली वाटचालीची प्रशंसा केली. स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांच्या भविष्यवेधी दृष्टीचे त्यांनी कौतुक केले. विद्यमान चेअरमन, उद्योगपती राजेश मालपाणी आणि त्यांचे सर्व सहकारी बँकेला अधिकाधिक प्रगतीपथावर घेऊन जातील व संगमनेरचे नाव देशाच्या सहकार क्षेत्रात झळकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सुरुवातीला बँकेचे संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. साईबाबा आणि लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कलंत्री यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.जितेंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मधुसूदन नावंदर यांनी केले. प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आधुनिक रॉक स्वरूपात अभंग, भारुड आणि संतवाणी सादर करणार्‍या सहा तरुणांच्या ‘अभंग रिपोस्ट’ या बँडने मालपाणी लॉन्सच्या सभागृहात धमाल उडवून दिली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विविध रचनांना त्यांनी आधुनिक शैलीतील संगीताचा साज चढवून त्या प्रभावीपणे सादर केल्या. या कलाकारांनी कार्यक्रम इतक्या उंचीवर नेला की, त्यांनी सादर केलेल्या जवळपास प्रत्येक अभंगावर रसिक विठ्ठलाचा जयघोष करीत होते. काही महिलांनी फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना विठ्ठल नामात तल्लीन करीत या कार्यक्रमाने उपस्थितांची वारीच घडवली.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

सामाजिक बांधिलकीतून उद्योजक बाळासाहेब देशमाने यांचा वाढदिवस साजरा

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ